मकरसंक्रांत आणि शेती संबंध, मकरसंक्रांतीचा सण साजरा का करायचा? - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, १५ जानेवारी, २०२४

मकरसंक्रांत आणि शेती संबंध, मकरसंक्रांतीचा सण साजरा का करायचा?



आपला भारत देश हा शेतीप्रधान आहे. भारताच्या विविध राज्यात आजही मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. आपले बहुतांश सण हे शेतीशी संबंधीत आहेत. मकरसंक्रांत माहिती आणि आपण सण का साजरे करतो हे मुलांना समजावून सांगणे गरजेच आहे. 


शेतातून हाती आलेले भरपूर पीक शेतकरी आणि त्याच्या कुटुंबातील लोकांना आनंद देणारा नसेल तरच नवल! त्यामुळे हा आनंद सणाच्या रूपात भारतभर साजरा केला जातो.


कधी हा आनंद रबी हंगामात आलेल्या पिकासाठी साजरा होतो तर कधी खरीप पीक हाती आल्याचा आनंद कोजागरी आणि दिवाळीच्या दिवसात व्यक्त केला जातो. सारांश आपले सण आणि उत्सव हे हा फेस्टिवल म्हणजे शेतीशी संबंधित आहेत हे आधुनिक यंत्रयुगात आपण विसरतोच!


मकरसंक्रांत हा भारतातील पौष महिन्यातील असाच एक शेती संबंधित सण आहे. त्यामुळेच या दिवसांमध्ये शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना स्त्रिया देतात. हरभरे, ऊस, बोरे, गव्हाची ओंबी, तीळ गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात. हा सण जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात आपण साजरा करतो पण मुळात सौर कालगणनेचा पौष महिना २२ डिसेंबर ला सुरू होतो! सूर्याचे उत्तरायण या दिवशी सुरू होते! म्हणजेच दरवर्षी २१-२२ डिसेंबरला सूर्याची किरणे पृथ्वीच्या साडेतेवीस दक्षिण या अक्षांशावर लंबरूपात पडतात आणि त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते.



आपली कालगणना ही चंद्रावर आधारित आहे असं आपण मानतो पण मुळात ती सौर म्हणजे सूर्याचे परिभ्रमण यावर अवलंबून आहे. त्यामुळे सौर कालगणनेशी संबंधित असा हा सूर्याच्या उत्तरायणाशी जोडलेला महत्त्वाचा भारतीय सण आहे.


मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या दिवसाला मकरसंक्रांत म्हटले जाते


हे सण उत्सव आपल्या रोजच्या जीवनाशी जोडलेले असे आहेत त्यामुळे आपले खाणे पिणे पोशाख यातसुद्धा या सणांच्या दिवशी बदल आपण करतो.


संक्रांत येते हिवाळ्यात! त्यावेळी हवामान थंड असतं त्यामुळे आपल्या शरीराचं तापमान गरम राहील असे उष्ण गुणधर्माचे पदार्थ आपण करून खातो!


संक्रांतीचा आदला दिवस महाराष्ट्रात भोगी या नावाने साजरा होतो. या हवामानात उपलब्ध सर्व शेंगभाज्या, फळभाज्या यांची तिळाचा कूट घालून केलेली मिश्र भाजी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी अणि मुगाची खिचडी असे पदार्थ या दिवशी आवर्जून केले जातात. संक्रांतीच्या दिवशी गुळाची पोळी आणि तिळगुळाचे विशेष महत्त्व असते.


तीळ , गूळ हे उष्णता देणारे पदार्थ आहेत. त्यामुळे हिवाळ्यात जेवणात त्यांचा समावेश आवर्जून केला जातो. या दिवसात फळं आणि भाज्या ताज्या आणि रसरशीत असतात. त्याच वापरून आपण भोगीची भाजी करतो!


आपण संक्रांतीला मुद्दाम काळ्या रंगाचे कपडे घालतो कारण काळा रंग सूर्याची उष्णता शोषून घेतो आणि आपल्याला उबदार वाटते!


ज्याने ही सृष्टी घडविली किंवा ज्याने हे धान्य आपल्याला दिले त्या शक्ती बद्दल किंवा निसर्गाच्या बद्दल कृतज्ञता आपण व्यक्त करतो.


तर असा हा सूर्याच्या मकर संक्रमणाचा उत्सव! सूर्याबद्दल आस्था आदर व्यक्त करणारा, भर थंडीत ऊब देणारा आणि तिळगुळ देऊन मायेची ऊब सुद्धा जपणारा!


♦️सर्व शेतकऱ्यांना आणि भारतीयांना मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...


अजय आदाटे

ॲग्रीकॉस एक्सपोर्ट प्रा. लि., पुणे

९४०३४६०१९४




test banner