मंगळवेढा:-
देशाच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत संजीवनी फाउंडेशनच्या वतीने सांगोला नाका परिसरातील स्मशानभूमीत ८० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
स्वातंत्र्य दिन केवळ ध्वजारोहण आणि देशभक्तीपर कार्यक्रमांपुरता मर्यादित न ठेवता, समाज आणि पर्यावरणासाठी विधायक उपक्रम राबविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
त्याचाच एक भाग म्हणून फाउंडेशनच्या वतीने विविध ठिकाणी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
यावेळी उपस्थित सर्व वृक्षप्रेमी मान्यवर, पदाधिकारी यांनी “झाडे लावा, झाडे जगवा” हा संदेश देत वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन केले.
वाढते प्रदूषण, बदलते हवामान आणि कमी होत चाललेली हिरवाई लक्षात घेता प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करणे गरजेचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
संजीवनी फाउंडेशनचा हा उपक्रम पर्यावरणप्रेमी नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरत असून, स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपण्याचा आदर्श संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
