मंगळवेढा : संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंगळवेढा शहरात सध्या रोडरोमीयोंचा सुळसुळाट वाढल्याची गंभीर बाब समोर आली आहे.शहरातील विविध भागांमध्ये विशेषतः शाळांच्या परिसरात,शिकवणी वर्ग आणि एसटी स्टँड भागात शाळकरी अल्पवयीन मुलींना रोडरोमीयांकडून नाहक त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून,यावर तातडीने आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.नागरिकांच्या मते, फक्त तक्रार आल्यानंतर तात्पुरती कारवाई करण्यापेक्षा पोलीस प्रशासनाने शाळा भरतेवेळी,मधल्या सुट्टीत आणि शाळा सुटल्यानंतर नियमित गस्त घालणे अत्यावश्यक आहे.तसेच एसटी स्टँड परिसरातही कायमस्वरूपी पोलिसांची उपस्थिती असावी,अशी मागणी करण्यात येत आहे.
या प्रकारामध्ये काही कॅफे चालकांचाही सहभाग असल्याची चर्चा असून,अशांची सखोल चौकशी करून त्यांच्यावरही कडक कारवाई करावी.
याचबरोबर,शहरातील सर्व हायस्कूल,शिकवणी वर्ग यांनी विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक सीसीटीव्ही कॅमेरे बसवले पाहिजे या सर्व समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी समस्त मंगळवेढेकरांच्या वतीने मंगळवेढा पोलीस स्टेशन,विविध हायस्कूल व एसटी स्टँड व्यवस्थापक यांना निवेदन देण्यात आले.
संतभूमी मंगळवेढ्याची सुरक्षित, सुसंस्कृत आणि आदर्श ओळख कायम राखण्यासाठी पोलीस प्रशासन,नगरपरिषद,शैक्षणिक संस्था,एसटी प्रशासन,पालक आणि नागरिक यांनी एकत्रितपणे पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे तसेच अशांना लोकप्रतिनिधींनी पाठीशी घालू नये असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
यावेळी सिद्धेश्वर आवताडे,रमेश जोशी,मल्लय्या स्वामी,नारायण गोवे,विठ्ठल गायकवाड,प्रकाश मुळीक,सतीश दत्तू,विलास देशमुख,प्रमोद सावंजी,हर्षद डोरले,गणेश सावंजी चंद्रकांत काकडे,बाळासाहेब नागणे,समाधान हेंबाडे,क्रांती दत्तू,राजवीर हजारे,देवदत्त पवार,प्रफुल्ल सोमदळे,सुजित मुदगुल,नागेश भगरे,अभिजीत शिंदे,उमेश ढगे,नाना भगरे,बाबा जाधव,स्वप्निल टेकाळे,अविनाश जाधव उपस्थित होते.
