बाबा आमटे : रंजल्या गांजलेल्यांचे बाबा. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

मंगळवार, २६ डिसेंबर, २०२३

बाबा आमटे : रंजल्या गांजलेल्यांचे बाबा.




बाबा आमटे (Baba Amte) हे नाव महाराष्ट्रात कुणाला माहित नसेल असे होणारच नाही. कुष्ठरुग्णांसाठी त्यांनी जणू नवे जग स्थापन केले. आजही त्यांची पिढी त्यांचा वारसा समर्थपने चालवत आहे. बाबा आमटे यांचे खरे नाव डॉ. मुरलीधर देवीदास आमटे. समाजाने छळलेल्या लोकांसाठी आणि कुष्ठरुग्णांसाठी त्यांनी अनेक आश्रम आणि समुदाय स्थापन केले. महाराष्ट्रातील चंद्रपूर येथे असलेल्या आनंदवनचे नाव प्रामुख्याने घेतले जाते.


बाबा आमटे यांनी आपले जीवन इतर अनेक सामाजिक कार्यासाठी समर्पित केले होते. वन्यजीव संरक्षण आणि नर्मदा बचाव आंदोलनामध्येही त्यांचा सक्रिय सहभाग होता. बाबा आमटे (Baba Amte) यांचा जन्म २६ डिसेंबर १९१४ रोजी महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट गावात झाला. त्यांचे वडील देविदास हरबाजी आमटे हे सरकारी सेवेत लेखापाल होते. त्यांचे बालपण अगदी छान गेले. ते जमीनदार होते.



बाबा आमटे यांनी M.A.L.L.B. पर्यंत शिक्षण घेतले. महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या नेतृत्वाखाली बाबा आमटे यांनी भारतभर दौरे केले आणि देशातील खेड्यापाड्यात गरिबीत जगणाऱ्या लोकांच्या खऱ्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. बाबा आमटे हे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्मा राजगुरू यांचे सहकारी होते. त्यानंतर त्यांनी राजगुरूंचा मार्ग सोडून गांधींचा अहिंसेचा मार्ग स्वीकारला.


एकदा त्यांना एक कुष्ठरोगी मुसळधार पावसात भिजताना दिसला आणि त्याला मदत करायला कुणीच येत नव्हतं. मग त्यांनी त्या रुग्णाला आपल्या घरी आणले. हाच क्षण त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला. त्यांनी ठरवलं की यापुढचं जीवन कुष्ठरुग्णांना अर्पण करायचं. यातूनच आनंदवनाची स्थापना झाली. रंजल्या गांजलेल्यांसाठी आनंदवन खरोखरच आनंदवन ठरले आहे.


गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमात राहत असताना गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होऊन बाबांनी स्वातंत्रप्राप्तीच्या चळवळीत स्वतःला झोकून दिले. इ.स. १९४३ मध्ये वंदेमातरम्‌ची घोषणा दिल्याबद्दल त्यांना २१ दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा झाली होती.


 स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही कुष्ठरोग निर्मूलनाच्या कार्यासह त्यांनी इतरही राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रश्नांवर विविध मार्गांनी आंदोलने केली व आपली प्रतिक्रिया नोंदवली. पंजाब दहशतवादाने वेढलेला असताना तेथील नागरिकांना इतर राज्यांतील भारतीय त्यांच्याबरोबर असल्याचा आत्मविश्वास देण्यासाठी बाबांनी पंजाबला भेट देण्याचे धाडस केले होते. त्यावेळी त्यांनी अनेक नेत्यांशी व प्रत्यक्ष नागरिकांशी संवाद साधला होता. राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार करण्यासाठी बाबांनी इ.स. १९८५ मध्ये ‘भारत जोडो’ अभियान योजले होते. यानिमित्त त्यांनी भारत भ्रमण करून जनतेपर्यंत एकात्मतेचे तत्त्व पोहोचवण्याचा प्रयत्‍न केला. नर्मदा बचाव आंदोलनात तब्बल एक तप (१२ वर्षे) नर्मदाकाठी मुक्काम करून त्यांनी आंदोलनाला पाठबळ दिले होते.


त्यांनी आनंदवन यासह सोमनाथ, अशोकवन इत्यादी अनेक कुष्ठरोग्यांसाठी सेवा संस्था स्थापन केल्या आहेत. 


जिथे हजरो रूग्णांची सेवा केली जाते. बाबा आमटे यांनी सकारात्मकतेचा एक दिवा लावला आणि आजही हा दिवा प्रज्वलित आहे. 

लोकांना सकारात्मकता देऊन, आशेचा किरण जागृत करु फेब्रुवारी २००८ रोजी वयाच्या ९४ व्या वर्षी बाबा आमटे यांचे चंद्रपूर जिल्ह्यातील वडोरा येथील निवासस्थानी निधन झाले. 


संकलन :

अजय आदाटे, मंगळवेढा.



test banner