शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी द्यायचे हे माझ्या काकांना विचारा- अजित पवार ७९ वर्षांचा माझा काका जीवाचं रान कशासाठी करतोय. तुम्हाला जाग आली पाहिजे आणि रागही आला पाहिजे! - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, १७ ऑक्टोबर, २०१९

शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी द्यायचे हे माझ्या काकांना विचारा- अजित पवार ७९ वर्षांचा माझा काका जीवाचं रान कशासाठी करतोय. तुम्हाला जाग आली पाहिजे आणि रागही आला पाहिजे!



मंगळवेढा(महादेव धोत्रे) शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी द्यायचे  हे माझ्या काकांना जाऊन विचारा असा टोला सत्तेत असणार्‍यां महायुतीला माजी उपमुख्यमंत्रीअजित पवार यांनी लगावला.                                                                   ते २५२ पंढरपूर मंगळवेढा विधानसभा च्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार भारतनाना भालके यांच्या प्रचार सभेत बोलत होते.         
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्याक्ष बळीराम काका साठे,राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाअध्यक्ष अनिता नागणे,राजेंद्र हजारे, उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले,कॉग्रेसचे जिल्हा सरचिटणीस फिरोज मुलाणी, स्वाभिमानीचे अ‍ॅड.राहूल घुले, पक्षनेते पांडूरंग नायकवाडी,विजयकुमार खवतोडे, मुरलीधर घुले, नगरसेवक प्रवीण खवतोडे,पांडूरंग चौगुले,सुरेश कोळेकर,राष्ट्रवादी शहरध्याक्ष  मुझ्झमील काझी, प्रज्वल शिंदे, संदीप फडतरे, सिद्रय्या माळी, प्रा.अकबर मुलाणी आदी मान्यवर नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्यने मंचावर उपस्थित होते                                                    पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, पाच वर्षामध्ये माझ्या शेतकर्‍याला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न भाजपा सरकारने केला. हे सरकार शेतकरी विरोधी आहे. मतांचा जोगवा मागण्यासाठी महाराष्ट्रामध्ये मोठ्या नेत्यांना येताना लाजा कशा वाटत नाहीत. त्यांनी महाराष्ट्रासाठी काय दिलंय? कर्जमाफी कशी करायची हे माझ्या काकांना जाऊन विचारा असा टोला सत्तेत असणार्‍यांना लगावला. कुणाला कुठल्या पक्षात जायचं ते त्यांनी ठरवावं. जोपर्यंत महाराष्ट्रातला शेतकरी साहेबांच्या सोबत आहे तोवर काळजी नाही. दुकानदारांना जाऊन विचारा, नोटबंदी आधी धंदा कसा होता आणि आता धंदा कसा चाललाय ते. शेतकर्‍याचा सातबारा कोरा  करून दाखवणार. तुम्ही भारतनाना भालके यांना निवडून द्या, राष्ट्रवादी आणि मित्रपक्षाच्या पाठीशी मोठ्या ताकदीने उभे रहा. नुसता आवाज नको. शेवटपर्यंत ही ताकद अशीच राहू द्या. आम्ही करून दाखवलंय. करून दाखविण्याची धमक आमच्यात आहे. निव्वळ फसवण्याचा धंदा या लोकांनी केला. आजपर्यंत पवार साहेबांनी केलेली कामं बघा. आपल्या लक्षात येईल. मी स्वत: सोलापूर जिल्ह्यात सर्वात अधिक सबस्टेशन दिले. 79 वर्षांचा माझा काका जीवाचं रान कशासाठी करतोय. तुम्हाला जाग आली पाहिजे आणि रागही आला पाहिजे. पवार साहेबांनी यांनी इतका त्रास दिला. ईडीची भीती दाखवली. हे पवारसाहेबांशी असं वागू शकतात, तर तुमच्या आमच्याशी कसं वागतील?

   बँकेच्या घोटाळ्यात, बँकेतील ठेवीपेक्षा घोटाळा मोठा आहे, असं मुख्यमंत्री म्हणतात. हे म्हणजे, म्हशीपेक्षा रेडकू मोठं असं झालंय. या पाच वर्षांत खर्‍या अर्थानं श्रीमंत कोण झालं? मंगळवेढ्याचा माणूस श्रीमंत झाला नाही. अंबानी आणि अदानी श्रीमंत झाले. मंगळवेढ्यातला एक नेता परवा नाचताना पाहिला. पवार साहेबांनी मागासवर्गीय तरुणाला संधी द्यायची म्हणून त्यांना किती मोठं केलं. पण त्यांनी पक्ष बदलला, गडी नाचायला लागला. हे नाच्याचंच काम करणार, दुसरं काही करू शकणार नाही. आपलं वय काय? आपली अवस्था काय? आपण मंत्री होतो, पण हलगी वाजायला लागली की यांच्या अंगात येतंय. पवार साहेबांनी यांच्यासाठी काय कमी केलं होतं म्हणून माणसं असं वागतायत.

   सत्तेत असणार्‍यांना ही सत्ता हातून जातीय याची भीती वाटत आहे. पण यांचं कर्तृत्व काय? आर आर आबांनी पाच वर्षांत 65000 पोलीसांची भरती केली. यांनी भरती थांबवली. आमच्या हातात सत्ता दिली तर आम्ही या सर्व भरती करून दाखवू. सध्याच्या सरकाला सुचतंय तरी काय? किल्ले भाड्यानं द्यायचं टेंडर काढलं. आम्ही पुढच्या पिढीला काय सांगायचं? ते आपली थट्टा करताय. आपला इतिहास बदलण्याचा प्रयत्न करतायत. यांच्या फसव्या बोलण्याला फसणारी ही जनता नाही हे मला माहीत आहे. म्हणूनच आज तुम्ही एवढ्या गर्दीने उपस्थित राहिले आहात.

   याप्रसंगी जाहीर सभेत बोलताना भारतनाना भालके म्हणाले, सत्ता उलटवून टाकण्यासाठी पवार साहेब आणि माझ्या पाठीशी उभे रहा. पंचवीस वर्षे सत्तेला चिकटून राहिलेल्यांना काय केलं ते आधी सांगाव आणि मग मतं मागायाला यावं. विकासाच्या नावानं बोंब पण एका घरात दोन दोन आमदार पाहिजे आहेत तरी कशासाठी? म्हणूनच तुम्ही जो विश्वास दाखवला तो विश्वास मताच्या रूपाने मला निवडून देण्यासाठी गरजेचा आहे.
. या जाहीर सभेत तावशी पंचायत समिती शिवसेना प्रमुख दादासाहेब लाड, कैकाडी समाज पंढरपूर, आवताडे ग्रुप पंढरपूरचे  प्रमुख पदाधिकारी प्रशांत मलपे, सुरज गुंड, माऊली पवार, महमदाबाद शे.चे अण्णासाहेब पाटील, पंढरीनाथ सुडके, दादा शिरतोडे, गणेश सोनवणे यांनी भारत नाना भालके यांना जाहीर पाठींबा देऊन पक्षात प्रवेश केला. मंगळवेढा तालुका व पंढरपूर परिसरातील नागरीक, शेतकरी, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.




test banner